७७ वर्षांत प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांचा बीनागुंडा-लाहेरी या दुर्गम भागातील नागरिकांशी मुक्त संवाद
नक्षलमुक्तीच्या दिशेने विश्वासाचा पूल; फार्मर आयडी, पायाभूत सुविधा व आरोग्य सेवांवर भर गडचिरोली, (जिमाका) दि.२९: गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावर, छत्तीसगड सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षांत प्रथमच जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देत नागरिकांशी खुलेपणाने संवाद साधला. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या संवेदनशील भागात जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यांच्या अडचणींची थेट पाहणी केली आणि शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना वैयक्तिक व सामूहिक वनपट्ट्यांबाबत माहिती घेतली. “वनपट्टेधारकांनी तातडीने फार्मर आयडी तयार करून घ्यावा, कारण याच ओळखपत्राच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी पक्का रस्ता, मोबाईल टॉवर, नियमित वीजपुरवठा, नवीन वनपट्टे अशा मूलभूत मागण्या मांडल्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे...