सात बालकांचे पुनर्वसन पूर्ण; विशेष दत्तक संस्थेचा अभिमानास्पद टप्पा.
गडचिरोली, (जिमाका) दि.28 : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत, महाराष्ट्र शासन मान्यता असलेली लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित विशेष दत्तक संस्था बजरंग नगर, हनुमान मंदिराच्या मागे, गडचिरोली येथे एका नव्या अनाथ बालकाचा दत्तक विधान सोहळा अत्यंत भावनिक व ह्रदयस्पर्शी वातावरणात पार पडला निराधारतेच्या अंधारातून प्रेम, सुरक्षितता आणि मायेच्या उज्ज्वल भविष्यातील आशेकडे वाटचाल करणाऱ्या या चिमुकल्याचा जीवनप्रवास नव्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचा क्षण उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.
जन्मानंतर प्रतिकूल परिस्थितीमुळे पालकांपासून दूर झालेल्या या बालकाला संस्थेने अत्यंत जिव्हाळ्याने सांभाळले. संस्थेतील आया, अधिपरिचारिका व कर्मचारी वर्गाने मातृत्वाच्या भावनेने त्याचे संगोपन केले. योग्य आरोग्यसेवा, संतुलित आहार, वेळेवर लसीकरण, तसेच प्रेमळ वातावरणात बालकाची सर्वांगीण वाढ सुनिश्चित करण्यात आली. या सर्व प्रयत्नांचे फलित म्हणजे आज त्या बालकाला कायदेशीर व कायमस्वरूपी कुटुंब प्राप्त झाले आहे.
आज एक छोट्याश्या चिमुकल्याला त्याचे हक्काचे आई वडील, सुरक्षित घर, आणि प्रेमळ माया देणारे कुटुंब मिळाले. जन्मतच एकटेपणाचा सामाना करणाऱ्या या चिमूकल्याच्या आयुष्यात नव्या आशेचा, विश्वासाचा आणि आनंदाचा नाव अध्याय सुरू झाला बाळाच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य पाहून उपस्थित प्रत्येकजण भावुक झाला.
या दत्तक विधान सोहळ्यास सौ. ज्योति कडू जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या हस्ते दत्तक पालकांना बालकाचे हस्तांतरण कायदेशीर प्रक्रिया करून करण्यात आले. या कार्यक्रमास सौ. वर्षा मनवर अध्यक्षा बालकल्याण समिति, श्री. दिनेश बोरकुटे सदस्य बालकल्याण समिति, श्री. अविनाश गुरनुले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, श्री. महेश रणदिवे अधिक्षक, शासकीय मुलाचे निरीक्षणगृह व बालगृह, गडचिरोली आणि विशेष दत्तक संस्थेचे संस्थापक श्री. पुरुषोत्तम चौधरी, अधिक्षक श्री. नशिब जांभुळकर, परिचर्या अधिकारी कु. डिम्पल सहारे, तसेच संस्थेच्या सर्व आया व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सौ. ज्योति कडू जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी मार्गदर्शनपर भाषणात दत्तक प्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, दत्तक ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून ती एका बालकाला आयुष्यभरासाठी कुटुंब, ओळख आणि सुरक्षितता देणारी सामाजिक बांधिलकी आहे, बालकाच्या आहाराबाबत मार्गदर्शन केले तसेच घरगुती पद्धतीने तयार करता येणारे पौष्टिक आहार, स्वच्छता, नियमित आरोग्य तपासणी, वेळेवर लसीकरण आणि बालकाच्या भावनिक विकासाबाबत आवश्यक सूचना नव्या पालकांना दिल्या.
बालकल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गडचिरोली यांच्या समन्वयातून संपूर्ण दत्तक प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पूर्ण करण्यात आली. संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आतापर्यंत सात बालकांना कायमस्वरूपी कुटुंब लाभले असून हा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद टप्पा आहे.
या सोहळ्यामुळे समाजामध्ये दत्तक प्रक्रियेबाबत सकारात्मक संदेश गेला असून निराधार बालकांना कुटुंब मिळवून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. विशेष दत्तक संस्था, गडचिरोली ही संस्था बालकांच्या संरक्षण, संगोपन आणि पुनर्वसनासाठी सातत्याने कार्यरत असून भविष्यातही अशाच प्रकारे अनेक बालकांच्या आयुष्यात आनंदाचे किरण फुलविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा