राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्ह्यात कर्ज पूरवठा वाढवावा- जिल्हाधिकारी बँकांच्या समन्वय सभेत दिले निर्देश.
गडचिरोली, दि.29: गडचिरोली जिल्ह्यातील अर्थचक्राला गती देण्यासाठी बँकांनी नागरिकांना कर्ज वाटप वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय समन्वय समिती संजय मीणा यांनी दिली. सर्व बँकांच्या तिमाही बैठकीत बँकिंग क्षेत्रातील विविध विषयावर जिल्हाधिकारी यांनी यावेळी आढावा घेतला. जिल्ह्यातील गरज ओळखून शेती, उद्योग तसेच लघू उद्योग व्यवसाय अशा क्षेत्रामधल्या कर्जपुरवठा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आरबीआयने निर्धारीत केलेल्या सूचनांनुसार जमा रकमेच्या प्रमाणात कर्जपुरवठा होणे आवश्यक असून येत्या काळात प्रत्येक बँकेने आपले कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट वाढवावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी बैठकीला आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक युवराज टेंभुर्णे तसेच सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात वाढ करण्यासाठी गरजूंना कर्जवाटप केल्यास त्यातून इतरही व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळेल. प्रत्येक बँकेने आपला प्रमुख उद्देश हा कर्जवाटपाचे उद्दिष्ट पुर्ण करणे हा असला पाहिजे असे मत त्यांनी बैठकीत व्यक्त केले. जिल्ह्याच्या विकासातून गडचिरोलीची मागास असलेली ओळख पुसण्यासाठी प्रत्येक बँकेने आपली रणनिती तयार केल्यास आर्थिक व्यवहार वाढतील. महिलांचे बचत गट असतील, छोटे मोठे व्यावसायिक असतील, दुग्ध व्यवसाय मत्स्य शेती यासाठी कर्जपुरवठा वाढविण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.
आकांक्षित गडचिरोली जिल्ह्यात नवउद्योजक, नवीन व्यवसायिक तयार होण्यासाठी त्यांना प्रोत्साहनाची गरज असते. बँकांनी जनजागृती शिबीरे घेवून शासनाच्या योजना, कर्ज वितरणाचे ऑफर लोकांपर्यत गावोगावी पोहचवाव्यात. विविध छापील साहित्य, योजनांच्या निधी वाटप कर्जाची माहिती या प्रकारच्या घटकातून तळागाळात पोहचण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थितांना यावेळी दिल्या. आमदार डॉ. देवराव होळी यांनी किसान क्रेडीट कार्ड, मत्स्य शेती यामध्ये नागरिकांना सहकार्य करुन पात्र लाभार्थ्यांना गतीने कर्ज पुरवठा करावा अशी विनंती यावेळी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा